- खासदार भावनाताई गवळी यांचा इशारा, केन्द्रीय वनमंत्र्यांना भेटणार
प्रतिनिधी यवतमाळ :- राळेगाव, कळंब तालुका परीसरात दिड वर्षात वाघाच्या हल्यात आतापर्यंन्त 13 नागरीकांचा बळी गेला आहे. वन विभाग मात्र अजुनही थातुरमातुर कारवाई करीत आहे. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेनेच्या आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा खासदार भावनाताई गवळी यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणात लवकरच केन्द्रीय वनमंत्र्याला भेटून नागरीकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
राळेगाव तालुक्याला लागुनच टिपेश्वर चे अभयारण्य आहे. या जंगलात वाघांची संख्या वाढल्यामुळे ते आता जंगलाशेजारी असलेल्या गावाकडे फिरत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान दिड वर्षात एका नरभक्षी झालेल्या वाघीनीने तब्बल तेरा नागरीकांना ठार केले. या वाघीनीच्या दहशतीमुळे शेतक-यांनी आपल्या शेतात जाणे बंद केले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केन्द्रीय वन मंत्र्याकडे करण्यात आली आहे.
- अनुदानावर सुविधा द्या
टिपेश्वन भागातील वाघ नेहमीच राळेगाव, कळंब, पांढरकवडा या भागात फिरत असल्याचे दिसून आले आहे. अशा अवस्थेत या भागातील शेतक-यांच्या जीवाला सतत धोका निर्माण झालेला आहे. एवढेच नव्हे तर वन्य प्राण्यांमुळे शेतीचे सुध्दा मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे प्रामुख्याने या भागातील शेतक-यांना अनुदानावर मचान, सोलर लाईट तसेच फेन्सींग ची व्यवस्था करुन देण्याची मागणी सुध्दा खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे.
- दगडखाणी बंद करा
टिपेश्वर अभयारण्या पासून अवघ्या चारशे मिटर अंतरावरील कोपामांडवी परीसरात सरकारने चार दगड खाणींना परवानगी दिलेली आहे. खाणीमध्ये रात्री सुध्दा ब्लास्टींग करुन दगड फोडले जातात. या खाणीमधील ब्लास्टींग चा आवाज खूप दुरपयन्त जात असल्यामुळे वाघांचे जंगलातील वास्तव्य धोक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर टिपेश्वर ते ताडोबा या वाघांच्या कॉरीडोर मध्ये येणा-या चंद्रपूर जिल्हयातील एसीसी सिमेंट फॅक्टरीला विस्तारासाठी सरकारने आनखी जागा उपलब्ध करुन दिली आहे. या सिमेंट फॅक्टरीच्या विस्तारामुळे वाघांच्या कॉरीडोर मध्ये व्यत्यय आला आहे. त्यामुळे एसीसी सिमेंट ला दिलेली ही जागा नामंजुर करावी तसेच टिपेश्वर परीसरातील खाणी बंद करण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी सरकारकडे केली आहे.


