- तूर आणि मुगाचे एकरी उत्पन्न घटण्याची भीती शेतकरी लागले डवरणीच्या कामाला
मुर्तिजापूर(प्रतिनिधी) महिन्याभरापासून सतत सुरू असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकून पडली होती. पावसाचा सतत राबता राहिल्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरू असलेल्या पावसामुळे मूग आणि तूर ही पिके बाधित झाली असून या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .सद्यस्थितीत उडीद, कापूस आणि सोयाबीन यांची स्थिती ठीक आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघड दिल्याने फवारणी तसेच निंदन आणि डवरणी या कामांनी वेग घेतला आहे. शेत ओलसर असले तरी डवरणी करण्यात येत आहे .
तसेच पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मिळालेल्या उघाडीचा फायदा घेऊन निंदन उरकून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. सरासरी एवढा पाऊस एका महिन्यात आल्ल्याने पिकांची वाढ खुंटलेली आहे .
यावर्षी आम्ही सोयाबीन तूर कापूस आणि मूग याची पेरणी केली. पेरण्या चांगल्या साधल्या. पाऊस देखिल वेळेवर आला .परंतु पाऊस जास्त झाल्याने पिकांची मशागतीची कामे राहून गेली त्यामुळे याचा परिणाम पिकांवर झाला जमिनीत ओल जास्त राहिल्याने तूर आणि मुग पिकावर परिणाम झाला असून ही पिके हातातून 80% गेली आहेत. भारत यदवर शेतकरी कौलखेड-जहागीर
पेरणीअगोदर पाऊस चांगला आला . त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पेरणीनंतर देखील पाऊस चांगला आणि वेळेवर आला. पण त्यानंतर पावसाने जी आघाडी उघडली ती काही केल्या थांबली नाही .तरीदेखील पिके तग धरून उभी आहेत तुर आणि मुग पिकांचे सरासरी उत्पन्न हे घटणार असून सोयाबीन कापूस आणि उडीद यांची स्थिती चांगली आहे .आता पावसाने उघाड दिल्यामुळे राहिलेली कामे उरकून घेण्याकडे आमचा कल आहे.
प्रमोद खोत शेतकरी समशेरपुर
जास्त पाावसामुळे पिके पिवळी पडली होती. आणखी तीन-चार दिवस जर पाऊस सतत लागून राहिला असता तर सर्वच पिके सडण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु तीन-चार दिवसांपासून पाऊस बंद असल्याने शेतकऱ्यांना धीर आला आहे.