- उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली:आज सर्व पक्षाचे निवेदन
मूर्तिजापूर - कमळगंगा नदीपात्रात अवैधरीत्या खोदून ठेवलेल्या महाकाय गड्यात २४ जून रोजी तालुक्यातील हेंडज येथील विरेंद्र सोळंके व वैभव मालवे या दोन बालकांचा बुडून दुर्दैवी अंत झाला त्या संदर्भात न्याय्य मागण्यासाठी बालकांच्या कुटूंबीयांनी घरातील शाळकरी चिमुकल्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक पाटील दांदळे यांच्या नेतृत्वाखाली २७ जुलै पासून आमरण उपोषण सुरू केले असून उपोणादरम्यान फुलसिंग सोळंके व सिंधु सोळंके या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.
त्याच प्रमाणे बालकांच्या परिवारांना न्याय मिळावा यासाठी सोमवारी अॉल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन या आदिवासी संघटनेने व भाजप वगळता तालुक्यातील सर्वच पक्षांच्या वतीने एसडीओ यांना निवेदने सादर करण्यात आली. मृतक बालकांच्या परिवारा शासकीय मदत मिळावी व संबंधित ठेकेदार सुधाकर चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देण्यासाठी सुरेश मडावी, विनोद गेडाम, सुभाष खुळे, रामचंद्र आत्राम, मनसेचे तालुका अध्यक्ष दिपक पाटील दांदळे, कॉग्रेसचे जितेंद्र गुल्हाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मयूर वहीले, निखिल ठाकरे, मो. शारीक, निजाम इंजिनिअर, इलियास खान, अब्दुल नावेद, समाजसेवक रवी राठी, मुकेश अटल, भारिपचे संजय नाईक, संदीप सरनाईक, प्रकाश मनावर, अजमल गवई, शिवसेनेचे शशीकांत लोडम, तसेच सिद्धार्थ तायडे, दिनेश दुबे आदी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मृतक बालकांच्या कुटूंबीयांना शासकीय मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला आहे त्याच प्रमाणे मृतक शाळकरी विद्यार्थी असल्याने त्यांना मदत मिळावी यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना कळविले आहे
राहुल तायडे
तहसीलदार, मूर्तिजापूर