मंगळवार ता २७ मार्च यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
शेतकऱ्यांना बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. यावर्षी तुरीचे पीक हाच एकमेव स्त्रोत शेतकऱ्यांपुढे होता. तुरीला बाजारभाव अतिशय कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकली. मात्र अजूनपर्यंत या शेतकऱ्यांकना तुरीचा मोबदला मिळालेला नाही. आता मार्च एन्डींग असल्याने बँकेचे व्यवहार व कर्जप्रकरणे निल करावी लागतात. यासाठी शेतकऱ्यांकडे पैसाच नाही.
शासनच शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांकडे आता कुठलीही आर्थिक तजवीज नाही. नाफेडकडे टाकलेल्या तुरीची रक्कम हेरून आर्थिक व्यवहार केले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना दोन ते तीन महिने लोटूनही तुरीचा मोबदलाच मिळालेला नाही. जवळपास ३४ कोटींपेक्षा अधिकची रक्कम अडकून पडलेली आहे. सातत्याने होत असलेल्या आघातामुळे शेतकरी खचत आहे. उत्पन्नाचा आश्वासित स्त्रोत नसल्याने आता नाफेडने नवे संकट या शेतकऱ्यांपुढे उभे केले आहे.
रबी हंगामातही गहू, हरभऱ्याचे पीक गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त केले. पाण्याची तजवीज असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळ पीक घेण्याचा प्रयत्न केला. त्यालाही बाजारभाव मिळत नसल्याने लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याला पुन्हा खासगी सावकार व पतसंस्थांच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.
