- डॉक्टरांची प्रतिकूल बाजू
केवळ 90% पेक्षा जास्त मार्कस् मिळाले म्हणून, किंवा आपले पालक अथवा नातेवाईक म्हणतात म्हणून, किंवा तुम्हाला जास्त पैसे कमवायचे आहेत म्हणून वैद्यकीय क्षेत्र अजिबात निवडू नका. जे खरचं कठीण परिश्रम करू शकतात, मानसिक ताण-तणाव सहन करू शकतात आणि ज्यांना मनापासून रूग्णांना बरे करण्याप्रती उत्कटता आहे आणि जे या क्षेत्रात आल्यानंतर आपल्या आवडी निवडींचा त्याग करण्यास तयार असतील, जे कोणत्याही कठीण परिस्थितीत टिकून राहू शकतील त्यांनी खरचं वैद्यकीय क्षेत्रात यावे.
कारण वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर तुमचे खाजगी असे जिवन जास्त रहातच नाही. तुमचा बहुतांश वेळ हा रूग्णालयात आणि रूग्णांच्या सान्निध्यातच जातो.
नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, अश्याच दोन बाजू प्रत्येक क्षेत्राच्या देखील असतात असं मी मानते. सगळ्यांसाठी वैद्य हा देवमाणूस समानच असतो, पण वैद्यांना सुध्दा बर्याच वाईट गोष्टींचाही सामना करावा लागतो.
आता हेच पहा ना, भारतामध्येच कितीतरी वैद्यांना मारहाण करण्यात आली आणि अजुनही मारहाण करण्यात येते. आणि या गोष्टी कोणीही वैद्य मानसिकरित्या मुळीच विसरू शकत नाही. सामान्य जणतेने खरंच वैद्यांकडून विश्वास गमावला आहे. निदान आत्तापर्यंत तरी जनतेकडून अशीच वर्तनुक होती. परंतु आता या Covid-19 मुळे काही अंशी ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे, मी ते ही मान्य करते.
असो..
मी एक प्रश्न स्पष्टपणे विचारते, स्वतःला ही आणि तुम्हाला ही, आजकाल खरचं अशे किती रूग्ण आहे जे वैद्याने सांगितलेले पथ्य इत्यादी गोष्टी अगदी विश्वासाने ऐकतात आणि त्याचे पालन करतात ?
अर्थातच दहा पैकी पाच रूग्ण हे वैद्याने सांगितले खरंच मनापासून ऐकत नाहीच. ५० ते ७० वयाच्या सुमारासचे केवळ जे वरिष्ठ नागरिक रूग्ण असतात खरंतर फक्त तेच वैद्यांच बोलणे अगदी सिरीयसली ऐकतात आणि त्याचे पालन करतात.
एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, कोणत्याही तरुण रूग्णापेक्षा जे वरिष्ठ नागरिक रूग्ण असतात ते रूग्णच वैद्याचे मनोभावे आभार मानतात. कारण तरुण रूग्ण फक्त वैद्यांना शुल्क देण्यासाठी आणि त्यांच्याकडून सेवा पुरवुन घेणारे मानतात. म्हणजेच मी तुला पैसे देतोय, त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा.! असा काहीसा आविर्भाव तरूण रुग्ण वर्गाचा असतो.
अशाच आणि इतरही बर्याच काही कारणांमुळे आजच्या तरुण वैद्यकीय पिढीमध्ये ताण, तणाव, उदासीनता, निराशा आणि एकाकीपणाचे प्रमाण वाढले आहे. वैद्य हा त्याचे मित्र, कुटुंब आणि सहकार्यांसह सभोवताली तर असतोच, परंतु तरीसुद्धा प्रत्यक्षात तो एकटाच असतो.
..आणि जर वैद्याच्या कुटुंबात अथवा मित्र परिवार मध्ये जर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कोणी नसल्यास, वैद्य सफर करत असलेल्या कठीण परिस्थितींना कोणी योग्य पद्धतीने नाहीच समजून घेऊ शकत. अशावेळेस तुम्ही वैद्यांना सहानुभूती नक्कीच देऊ शकाल, पण तुम्ही आमच्या वैद्यकीय क्षेत्राची वास्तविकता समजण्यास असमर्थच व्हाल.
आम्हाला आधी शिक्षणामुळे तुमच्या सगळ्यांपासून दूर रहावे लागते आणि नंतर काम सुरू झाले की दिवस रात्र रूग्णालय आणि रूग्ण यांच्यासमवेतच दिवस जातात. यामुळे आम्हाला तुम्हा सगळ्यांशी भेटणं तर लांबच पण कॉल अथवा मेसेज वर देखील बोलायला एवढा वेळ मिळत नाही. ईतके आम्ही रूग्णालयामध्ये रूग्णांचे व्यवस्थापन करण्यात व्यस्त होऊन जातो.
खरंच इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वैद्यकीय क्षेत्र हे सर्वात व्यस्त क्षेत्र आहे. कारण या क्षेत्रात दिवस रात्र २४ तास सेवा करत रहावी लागते. अशा परिस्थिती मग बर्याच जणांचा असाच समज असतो की वैद्य किती अहंकारी आणि गर्विष्ठ असतात, का तर आम्ही तुम्हाला भेटंत बोलंत नाही, वेळ देत नाही म्हणून..
बाकीच्या या सर्व गोष्टींमुळे आम्ही आधीच निराश झालेलो असतो आणि अशा वेळेस वैद्यांनाच जर कोणी समजून घेणार नसेल तर अथार्तच वैद्य उदासीन, निराश होऊन एकाकीपणाकडे वळतात. शेवटी वैद्य सुध्दा माणूसच आहे. त्यालाही मन असतं. कारण एकाच शाखेत काम करणारे सहकारी एकमेकांकडे स्पर्धक म्हणूनच पाहतात. इतके की ते तुम्हाला अपयशी झालेले पाहण्यासाठी आतुर असतात. खरंतर अशा वेळेस वैद्यांना तुम्हीच स्वत:हुन समजून घेऊन, तुमच्या साथ ची खरी गरज असते. या सर्व अलौकिक अपेक्षा सह, वैद्य त्याच्या मानसिक आरोग्य सह अनेक संघर्ष करत राहतो.
म्हणूनच सर्व वैद्यांना मी हेच सांगु इच्छिते की, मान्य आहे ही सर्व परिस्थिती प्रत्येक वैद्यासाठी कमी जास्त प्रमाणात असेल, पण हे तेवढेच खरे आहे की आपल्याला या वास्तव्यासह जगून, लढत राहून, यातून चांगलेच शिकत राहीले पाहीजे आणि अशा परिस्थितींशी लढण्यास स्वतःला कणखर केले पाहिजे.
म्हणून जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्र निवडायचे असेल तर तुम्हाला फक्त शरीरानेच नाही तर मनाने देखील मजबूत राहणं अपेक्षित आहे.
डॉ. अक्षया विजय पवार.
(वैद्यकीय अधिकारी, सोलापूर महानगर पालिका)