- रोजच्या रोज याच वास्तवाला का सामोरं जावं लागतं आपल्याला?
फोटोतल्या या विराजकडं बघितलं तरी मला भडभडून येतं. किती कोवळा आणि गोड, निरागस दिसतोय हा विराज. लहानपणी, म्हणजे तो अगदी नऊ महिन्यांचा असतानाच त्याचे वडील गेले. आईनं तळहातावरच्या फोडासारखं जपलं या पोराला. तो एकुलता एक. त्या माऊलीला दुसरं अपत्य नाही. पोरगा शिकेल, घराचे पांग फेडेल, हीच आशा त्या माऊलीला.
पिंपरी- चिंचवडच्या तक्षशीलानगरच्या बौद्ध विहाराजवळ राहाणारा वीस वर्षांचा विराज कॉलेजात शिकत होता. नवी स्वप्नं बघत होता. काही नराधमांनी या कोवळ्या पोराचा जीव घेतला. अमानुष अशी मारहाण केली. त्याला अवमानित केले. संपवून टाकले. पोलिसात दाखल झालेली तक्रार सुन्न करणारी आहे.
कारण काय, तर म्हणे विराजची एका मुलीसोबत मैत्री होती. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं.
प्रेम करणं हा गुन्हा कधीपासून झाला या देशात? प्रेम करताना जात बघायची, हा निकष कोणी ठरवला इथं? तरूण-तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडतात, ही तर आशा आहे या जगात! द्वेष आणि विखारानं भरलेल्या या भवतालात प्रेमाशिवाय आश्वासक आणखी काय आहे?
'तू खालच्या जातीचा आहेस आणि आम्ही वरच्या जातीचे आहोत', असं निर्लज्जपणे सांगणारी माणसं एरव्ही शिवरायांचं नाव घेत असतात. शाहू महाराजांचा जयजयकार करतात. शिवराय वा शाहूंचं नाव तरी घ्यायची लायकी आहे का अशांची? ज्या शाहूंनी स्वतःच्या बहिणीचं लग्न धनगर जातीतल्या मुलाशी केलं, त्या शाहूंचा वारसा हे सांगणार! अरे, शाहू वगैरे सोडा. विलासराव देशमुखांच्या मुलांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्नं केली. शरद पवारांच्या मुलीनं आंतरजातीय लग्न केलं. ब्राह्मण प्रमोद महाजनांच्या बहिणीनं वंजारी असलेल्या गोपीनाथ मुंडेंशी लग्न केलं. राणा जगजितसिंह पाटील यांनी चांभार जातीतील मुलीशी लग्न केलं. यापैकी कोणालाही खालची जात वा वरची जात असं काही आठवलं नाही. आणि, तुम्ही रे कसले पाटील, की तुम्हाला आपली जात थोर आणि इतर मात्र हलक्या जातीचे वाटू लागले!
थोडी शरम, थोडीही लाज नाही वाटत? मुला-मुलीशी बोलून या विषयावर चर्चा करण्याची, मार्ग करण्याची गरज नाही भासत?
जातीच्या नावानं असे अत्याचार करणा-या नराधमांना वाचवणारी यंत्रणाही आपल्याकडं आहे, म्हणून त्यांचं फावतं.
अजून किती आग लावून, किती जणांना जाळून, या जात नावाच्या विषाणूची भूक भागणार आहे?
'प्रेम' नावाची अडीच अक्षराची गोष्ट जाळून टाकणारी 'जात' नावाची दोन अक्षरी आग आता तरी विझवली पाहिजे. नाहीतर, उद्या ही आग प्रत्येक घरात घुसून आपलं जगणं भस्मसात करून टाकेल.
'मी मराठा वा ब्राह्मण आहे, म्हणजे मी थोर' आणि, कोणी बौद्ध, मांग वा चांभार आहे, म्हणजे तो हलका, हे ज्यांच्या ज्यांच्या आजही मनात येतं, ते सगळे विराजचे मारेकरी आहेत. मुख्य म्हणजे, ब्राह्मणांना शिव्या घालताना 'शाहू-फुले-आंबेडकर' सांगायचे आणि बौद्ध पोराला मारून टाकताना मात्र मनुस्मृतीला डोक्यावर घेऊन नाचायचे, हा दुटप्पीपणा बंद झाला पाहिजे. सगळे असेच आहेत, असे नाही; पण काळजी करावे एवढे हे प्रमाण नक्कीच आहे.
आजवर गावागावात दलितांचे आणि स्त्रियांचे शोषण कोणी केले? ही व्यवस्था तयार केली ब्राह्मणी मनुवादानं. जातपितृसत्ताक व्यवस्थेनं. पण, गावागावात तिला बळ दिलं ते पाटील आणि देशमुखांनीही, हे नाकारून चालणार नाही. आज या ब्राह्मणी आणि जातपितृसत्ताक व्यवस्थेचे वाहक भलतेच आहेत. त्यात ब्राह्मणेतर आणि मराठेतरही मागे नाहीत.
जातीच्या मुद्द्याला आता वर्गीय आणि आर्थिक संदर्भ जोडले गेले आहेत हे खरे; पण मूळ मुद्दा जातपितृसत्तेचा आहे. मुला-मुलींचं लग्न जिथे पालक ठरवतात, अशी विवाहसंस्था, कुटुंबसंस्था अशी मोठी कारणपरंपरा आहे.
शिवराय, शाहू, विठ्ठल रामजी शिंदे न समजलेल्यांना आता तरी मूल्यव्यवस्था समजावून सांगावी लागेल. नराधमांना वेळीच तुरूंगात डांबावे लागेल. जातीचा माज करणा-यांची नांगी ठेचावी लागेल.
एक लक्षात घ्या. अशा जात्यंधांना जात नसते. विखार हीच त्यांची जात असते. त्यामुळे सगळ्या जातबांधवांना आरोपी मानण्याचे कारण नाही. पण त्याचवेळी हे आपल्या जातीचे आहेत, म्हणून त्यांना मदत करण्याचा वा वाचवण्याचा विचारही कोणाच्या मनात येता कामा नये.
अशा घटनांमुळे तरी जातीयवाद कमी व्हायला हवा. जातीचं निर्मूलन करण्यासाठी 'माणसां'नी उभं राहायला हवं. अशा घटनांनंतर दोन जातींमधील तेढ आणखी वाढवली जाणार असेल, तर जातीअंताकडे नव्हे, जगाच्या अंताकडे आपली वाटचाल सुरू आहे!
बदलावं लागेल आपल्याला मुळातून.
नाहीतर,
आणखी किती विराज असेच मरत जातील, हे सांगणंही अवघड आहे.
प्रेमावर हा देश उभा करायचा की विखारावर, याचं उत्तर आता तरी आपल्याला द्यावंच लागेल!
- संजय आवटे