उमरखेड :- तालुक्यातील खरुस( बु ) येथील एका अज्ञात व्यक्तीच्या आलेल्या फोनची कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता तेथील मातंग समाजाचे श्रद्धास्थान असलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा परंपरागत ध्वज उमरखेड पोलीसांनी कापून काढला . त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरूद्ध कठोर कार्यवाही करावी , अशी तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे खरूस ( बु ) येथील संतप्त मातंग समाज बांधवांनी केली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , काल दि . ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास उमरखेड पोलीस स्टेशनचे पो . उपनिरिक्षक पांडूरंग शिंदे हे पोलीस वाहनाने ताफ्यासह खरूसगावात दाखल झाले .व त्यांनी लहुजी साळवे चौकातील 3५ते ३० वर्षापासून परंपरागत असलेला मातंग बांधवांचे श्रद्धास्थान असलेला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ध्वज पोलीसांनी कापून काढला असल्याचे पोलीस अधिक्षकांकडे पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे .
पोलीसांकडून अनाहुतपणे झालेल्या या कृत्यामुळे गावातील समाज बांधव एकत्रित आले व त्यांनी थेट उमरखेड पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार हनुमंत गायकवाड यांना जाब विचारला असता अज्ञात व्यक्तीने केलेल्या फोनची दखल घेऊन मीच पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग शिंदे यांना तेथे ताफ्यासह पाचारण करून ही कार्यवाही करण्याचे सांगीतले असल्याची स्पष्टोक्ती दिली . गावातील सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने एकत्रित नांदत असतांना गावात जातीय तेढ निर्माण करण्याच्या कुटील हेतूने प्रेरित होउन अज्ञात उपटसुंभ समाजकंटकाने फोन केल्यानंतर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता ध्वज कापून महापुरुषाचा अवमान केला त्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सर्व संबंधितांविरुद्ध कठोर कार्यवाही करावी व गरीब मातंग समाज बांधवांना संरक्षण द्यावे ,अशी मागणी दयानंद सुरोशे, बालाजी काळे , देविदास काळे , अमोल सुर्यवंशी आदिंनी राज्याचे मुख्यमंत्री , सामाजिक न्याय मंत्री यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे
SHARE THIS