![]() |
एनआरसीने जाहीर केलेली यादी अंतिम नसली तरी या यादीतील घोळ चव्हाट्यावर आल्याने त्यावरून राजकारण तापले आहे. माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांची नावं या यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे बंधू एकरामुद्दीन अहमद यांच्या कुटुंबीयांचंही या यादीत नाव नाही. आसामच्या दक्षिण अभयपुरी मतदारसंघातील भाजपचे आमदार अनंत कुमार यांचंही या यादीत नाव नसल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत माजी राष्ट्रपतींच्या कुटुंबीयांची नावं नसलं तरी उल्फा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख परेश बरुआ याचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. मात्र त्याची पत्नी बॉबी भुयान आणि दोन मुलं अरिंदम आणि आकाश यांचं नाव या यादीतून गायब आहे.
दरम्यान, ४० लाख लोकांना बेकायदा ठरवल्यानं आसाममध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आसामलाच लागून असलेल्या बांगलादेशातील अनेक जिल्ह्यातही तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आसाममध्ये १४४ कलम लागू केलं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यात २२ हजार जवान तैनात केले आहेत.