११ वीचे ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित



 मुंबई :- अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेशाची चौथी यादी मंगळवारी जाहीर झाली. मात्र, चार याद्या जाहीर होऊनही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असून, त्यामुळे संतप्त झालेल्या काही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मंगळवारी चर्नीरोड येथील शालेय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली. चारपैकी एकाही यादीत नाव आले नाही... अल्पसंख्याक कॉलेजांतील प्रवेशाचे काय?... आम्हाला प्रवेश मिळणार कधी? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी झाली. दरम्यान, या विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रवेश प्रक्रिया कशी असेल याबाबत आज, बुधवारी निर्णय होणार असल्याचे समजते.

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी व सर्वांना समान संधी देण्यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. मात्र, ही प्रक्रिया यावर्षी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मंगळवारी सकाळी चौथी यादी जाहीर झाली. मात्र, काही कॉलेजांमधील कट ऑफ वधारल्यामुळे या यादीतही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. चौथ्या यादीसाठी एकूण ८१ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी केवळ ४९ हजार ०६२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले असून, तब्बल ३२ हजार १ विद्यार्थ्यांना कोठेही प्रवेश मिळालेला नाही. अशा अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संपूर्ण शिक्षण उपसंचालक कार्यालयात शुकशुकाट होता. त्यामुळे पालकांचा पारा आणखी चढला. अखेर शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कार्यालयात पोहचून पोलिसांच्या मदतीने पालकांची समजूत घातली.

दरम्यान, कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे शिक्षण उपसंचालक अहिरे यांनी स्पष्ट केले. 'प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी आयोजित केली जाणार असून, लवकरच त्याबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, असे सांगत, इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाइटवर वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.


  • विद्यार्थ्यांसाठी झुगारला संप

मंगळवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असतानाही चर्नी रोड येथील शालेय शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सकाळी कार्यालयात हजेरी लावली. मात्र, सर्वांनी एकमताने संपात सहभागी व्हायचे असे ठरलेले असल्याने कार्यालयात आलेले सर्व कर्मचारी निघून गेले. त्यांच्यात 'सर्व शिक्षा अभियाना'अंतर्गत नेमणूक करण्यात आलेले व अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा दांडगा अनुभव असलेले अधिकारी अविनाश रणदिवे हेही होते. त्यांनी संपात सहभागी होण्यास नकार दिला. 'काम करू नका', असे त्यांना संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, 'उपसंचालक कार्यालयात सकाळपासून रांगा लावलेल्या पालकांना उत्तर देणे व विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करणे हे माझे कर्तव्य आहे', असे सांगत त्यांनी कार्यालयातून बाहेर पडण्यास नकार दिला. जमलेल्या जमावाला शांत करण्यासाठी रणदिवे पोलिसांच्या मदतीने घोळक्यात गेले. त्यांनी पालकांच्या शंकांचेही समाधान केले. यावेळी त्यांना शिक्षण उपसंचालक अहिरेंचीही साथ लाभली. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post