- मुंबई येथे उमरगा शहरातील पत्रकार सचिन बिद्री यांचा राज्यस्तरीय महामित्र म्हणून सत्कार
इकबाल मुल्ला
लोहारा:- युगातील वेगवान संपर्कसाधकांचा म्हणजेच सोशल मीडियाचा विधायक उपयोग व्हावा आणि विवेकी समाज घडवावा यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचनालाय महाराष्ट्र शासन यांनी राबविलेल्या सोशल मीडिया महामित्र स्पर्धेत उमरगा,लोहारा या क्षेत्रस्तरातून एन टी व्ही चे प्रतिनिधी पत्रकार सचिन बिद्री यांची निवड राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली होती.‘सोशल मिडिया महामित्र’ या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपक्रमाच्या राज्यस्तरिय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे महामित्रांना संबोधित केले.यावेळी महाराष्ट्र टाईम्स चे ज्येष्ठ संपादक अशोक पानवलकर,न्युज 18 लोकमत चे डॉ.उदय निरगुडकर,दिनकर रायकर, माहिती तंत्रज्ञानाचे सचिव श्रीनिवासन,अनुलोम संस्थेचे अधिकारी,उस्मानाबाद जिल्हामहिती अधिकारी मनोज सानप,मराठी फिल्म जगतातील नामवंत अभिनेते तथा ना.म.फाउंडेशन चे मकरंद अनासपुरे,अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर,स्पृहा जोशी, उद्योगपती मिलिंद कांबळे,दीपक घैसास,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार,रिलायन्स जिओ कंपनीचे अधिकारी वर्ग आणि उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दि 24 मार्च रोजी घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय भव्य कार्यक्रमात मुंबई येथिल यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार सचिन बिद्री यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सोशल मीडिया महामित्र म्हणून सन्मानित करण्यात आले.
या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करताना करताना मुख्यमंत्री म्हणाले की,समाजमाध्यमांमध्ये सकारात्मकतेचे बिजारोपण करण्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.भक्कम लोकशाहीसाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज माहितीचे युग आहे.आपण प्रत्येक जण स्वतंत्र आहोत. पण, आपले स्वातंत्र इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होणार नाही,अभिव्यक्तीचे खरे तर हे फार मोठे सौंदर्य आहे.सरकार सामान्यांसाठी अनेक उपाय करीत असते. पण ते समाजापर्यंत नेण्यासाठी जनसहभाग अधिक महत्त्वाचा आहे. त्यातून अधिकाधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. महालाभार्थी हा असाच एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या सोशल मिडिया महामित्रांवर सर्वांत मोठी जबाबदारी आहे ती या माध्यमांचा सकारात्मक फायदा करण्याची.यासाठी एक मजबुत ढाल म्हणून, सकारात्मकतेचे लष्कर म्हणून ही महामित्रांची टीम म्हणजेच राज्यातील कानाकोपऱ्यातून शोधून काढलेले हिरे आहेत,सोशल मीडिया च्या माध्यमातून शासनाच्या योजना दारोदारी पाहोचविण्याचे महान कार्य करतील,याचा मला ठाम विश्वास आहे.

