- परमहंस संत पुंडलिक महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्य पहिले शेतकरी साहित्य संमेलन संपन्न
प्रकाश श्रीवास
मूर्तिजापूर,ता.२० : साहित्यात आजवर शेतकरी व्यसनी, आळशी, अंधश्रद्ध, बह्याड असा रंगविल्या गेला. धर्म आणि राजकारणातील 'गब्बरसिंग' त्याची लूट करीत आले. 'बारोमास' पर्यंत, तर तो साहित्यकृतींमध्ये हिरो नव्हताच. हे चीत्र बदलावे आणि साहित्य शेतकऱ्यांचा लेखणीतून यावे, साहित्यिक शेतकऱ्यांच्या जिव्हेतून बोलावा, अशी अपेक्षा शेतकरी नेतृ, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केली.
परमहंस संत पुंडलिक महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्य यात्रा महोत्सवांतर्गत आयोजित पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. येथील पुंडलिक नगरातील भाई सरोदे गुरूजी साहित्य परीसरातील कविवर्य उ.रा.गिरी सभामंचावर शेतकरी नेते व शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक विजय जावंधिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून शेती प्रश्नांचे अभ्यासक अभियंता अमिताभ पावडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, पुंडलिक महाराज संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव पातोंड उपस्थित होते. दीपप्रज्वलन तसेच कवीवर्य उ.रा.गिरी व भाई सरोदे गुरुजी यांच्या प्रतिमापुजनानंतर जनमंचचे तालुकाध्यक्ष प्रा.सुधाकर गौरखेडे, राजु वानखडे, मधुकरराव इंगोले, विजय गावंडे यांनी पाहुण्यांचे स्वामी विवेकानंदांचे पुस्तक, शाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. माधवराव काळे यांनी राष्ट्रसंतांची अर्पणपत्रिका सादर केली. प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी प्रास्ताविकातून संमेलन आयोजनामागील भूमिका विशद केली. विजय गावंडे यांनी भाई सरोदे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याची युवापिढीला माहिती करुन देण्याच्या उद्देशाने तालुक्यातील शेतकरी चळवळीच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
साहित्य आणि शेतकऱ्यांचा संबंध धर्माने तोडल्याचे प्रखर वास्तव अमिताभ पावडे यांनी विविध दाखले देत नमुद केले. 'शेतकरी तितुका एक' आणि 'भीक नको कामाचे दाम हवे', हे शेतकरी संघटनेचे तत्व पुनरूज्जीवीत व्हावे, असे सांगुन कोणत्याही देशात सरकारच्या मदतीशिवाय शेती चालत नसल्याचे वास्तव अध्यक्षीय भाषणातून विजय जावंधिया यांनी मांडले.सूत्रसंचालन पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर यांनी केले. राजु वानखडे, शरद बंग, मून्ना नाईकनवरे, नितीन गावंडे, सागर ढोरे, कैलास साबळे, गोपाल तायडे, मधुकरराव इंगोले, पंकज कांबे, प्रा. सुधाकर गौरखेडे, अरूण बोंडे, विवेक पातोंड, प्रशांत देशमुख, जीवन ढोकणे, गोविंदराव बरडे, सेवकराम लहाने, मनोहर ताकतोडे यांनी आयोजनात पुढाकार घेतला.
