जनता दरबारात अधिका-यांनी स्वत: उपस्थित राहण्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश जनता दरबारात एकूण 104 तक्रारी प्राप्त

जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण 104 तक्रारी प्राप्त . सर्व शासकीय योजनांची परिपुर्ण माहिती विभागप्रमुखांनी .बैठकीला येतांना सोबत आणावी -प्रत्येक सोमवारी जनता दरबारापुर्वी एका खात्याचा आढावा .येत्या जनता दरबारा पुर्वी जिल्हा परिषदेतील योजनांचा आढावा घेणार

अकोला ( प्रतिनिधी ) दि. 15 . दर सोमवारी होणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज सोमवार दि.15 जानेवारी 2018 रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण 104 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांनी स्वत: उपस्थित राहण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. पालकमंत्री यांच्या जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदींसह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, व्यक्तीगत लाभाच्या योजनासह सर्व शासकीय योजनांची माहिती तसेच यावर्षीचा लक्षांक, केलेली पुर्तता यासंबंधीचे सर्व माहिती विभागप्रमुखांनी बैठकीला येतांना सोबत आणावी असेही ते म्हणाले. जनता दरबारापुर्वी एका खात्याचा आढावा घेण्यात येईल. पुढील जनता दरबारा पुर्वी जिल्हा परिषदेतील योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे तरी संबंधीत जिल्हा परिषदतील संबंधीत विभागाच्या विविध अधिका-यांनी आपल्या विभागाची परिपुर्ण माहिती बैठकीत येतांना सोबत आणावी.या जनता दराबारात काही विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित नसल्यामुळे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील जनता दरबारात विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे असे निर्देश देवून पालकमंत्री पुढे म्हणाले की, केवळ अपवादात्मक परिस्थीतीतच वरिष्ठ अधिका-यांची परवानगी घेवूनच प्रतिनीधी पाठवावा असेही त्यांनी सांगितले.नवीन तक्रार कर्त्यांना 15 दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तक्रार कर्त्यांना दिला. प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, 

याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागप्रमुखांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, या पुढेही नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी दक्षता घ्यावी. तक्रार घेवून आलेल्या नागरिकांची निराशा होता कामा नये. याकडे विभागप्रमुखांनी कटाक्षांने लक्ष देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात , अशा सुचना त्यांनी दिल्यात.आज झालेल्या जनता दरबारात एकूण 104 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामाबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारातील प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग- 39 तक्रारी, पोलीस विभाग-09 , जिल्हा परिषद-29 , महानगर पालिका- 12 , जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था- 03 , जिल्हा अग्रणी बँक - 03 , जिल्हा शल्य चिकित्सक - 03, इतर - 06 अशा एकुण 104 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या. पालकमंत्री कार्यालयाच्या वतीने जनता दरबाराच्या नियोजनाची जबाबदारी पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे हे पार पाडतात. या बैठकीला उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर , राजेश खवले, अकोल्याचे उप विभागीय अधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांचेसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post